मलकापूर (हॅलो बुलढाणा) सत्ताधारी पक्षातील मलकापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांनी एका शेतकऱ्याची अडचण ऐकूण न घेता आपल्या गाडीत बसून काढता पाय घेतल्यामुळे शेतकऱ्याने त्यांना चांगलेच खडेबोल सुनावून संताप व्यक्त केलाय. दरम्यान या प्रकाराचा व्हिडीओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट करीत ‘सत्तेची मुजोरी, अहंकार संबोधत निवडून देणाऱ्या मतदाराशी हेकेखोरी बरी नव्हे, सत्ता अमर नसते’ असा जोरदार टोला लगावला आहे.
‘साहेब,आम्ही काय खराब आहो काय? तुम्हाले फक्त उत्तरं भेटत नाही. साहेब, तुम्हाले सांगतो राजा आम्ही अशा परिस्थितीत आहो की आमचं आम्हाले माहीत आहे. सारं तुमच्या हातात आहे, तुमच्या अधिकारात आहे. तुम्ही का नाही करत?’ असा संतप्त संवाद एका शेतकऱ्याने आम. चैनसूख संचेती यांचेशी केला असता संचेती यांनी उडवा उडवीचे उत्तर देत वाहन पुढे काढल्याची चित्रफीत व्हायरल झाली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि सत्ताधाऱ्यांची त्यांच्याप्रती असलेली भूमिका हा लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकले जात नाहीत, तेव्हा समाजात अस्वस्थता आणि संताप निर्माण होणे स्वाभाविक आहे. नेमके यावर बोट ठेवत कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला. त्यांनी व्हिडीओ पोस्ट मध्ये अधोरेखित केले की,
‘ही बघा सत्तेची मुजोरी..
सत्तेचा इतका अहंकार?
ज्यांनी निवडून दिले त्यांच्याशीच हेकेखोरी?
अमाप पैसा आणि धर्मद्वेषाचे राजकारण करून निवडून यायचं आणि नंतर ज्या जनतेने मत दिलं त्यांनाच क्षुल्लक समजायचं! चैनसुख संचेती जी, विसरू नका… सत्ता अमर नसते, जनता ही मुजोरी कदापी सहन करणार नाही!’ अशी पोस्ट सत्तेचा माज उघड करीत आहे.
दरम्यान हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, सत्ताधाऱ्यां विषयी सामान्य नागरीक व शेतकरी कॉमेन्ट बॉक्समध्ये आगपाखड करून संताप व्यक्त करत आहे. कोरड्या दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सत्तेतील आमदाराला साधं उत्तर द्यायला वेळ नसणे म्हणजे या पेक्षा दुर्भाग्य कोणते? हा प्रश्न लोकशाहीची लक्तरे टांगणारा आहे.












Total Users : 3475065