बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांची बुलढाणा येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती संदर्भातील विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करून शेतकरीहिताचे प्रश्न रेटले. याबाबत ना. मकरंद पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹२ लाख प्रोत्साहनपर अनुदान, २००९, २०१७ व २०१९ च्या कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीत समावेश, आयटीआर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तसेच बँकांनी परस्पर पुनर्गठन केलेल्या कर्जधारक शेतकऱ्यांचाही कर्जमाफीत समावेश करावा, अशी मागणी केली. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचे सिबिल खराब होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून बँकांना रिझर्व बँकेद्वारे निर्देश द्यावेत, तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणीही यावेळी केली. या सर्व मागण्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर ताकदीने मांडण्याचे आश्वासन नामदार मकरंद आबा पाटील यांनी यावेळी दिले. पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आता सरकारने या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे.अन्यथा शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागेल,असा इशाराही दिला.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमोल मोरे, ॲड. प्रवीण सुरडकर, दत्तात्रय पाटील, पप्पू अंभोरे यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.















Total Users : 3295767