spot_img
spot_img

काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता शेतात गेला… मोटर सुरू करण्यासाठी पुढे झाला… अन् एका क्षणात सगळं संपलं!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाच शेतकऱ्यांसाठी काळजाचा ठोका चुकवणारी दुःखद घटना समोर आली आहे. शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या काँग्रेस पक्षाच्या ३७ वर्षीय निष्ठावंत कार्यकर्त्याचा विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ६ जुलै रोजी सकाळी घडली.

मृत तरुणाचे नाव स्वप्निल रघुनंदन आमले असून ते जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रहिवासी होते. स्वप्निल आमले हे तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार शिवारातील आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. शेतातील मोटर पंप सुरू करण्यासाठी ते मीटर पेटीजवळ गेले असता अचानक विजेचा जोरदार धक्का बसला आणि क्षणात सर्व काही संपले.

स्वप्निल आमले हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत, सक्रिय आणि जनतेच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तसेच पिंपळगाव काळे आणि माळेगाव बाजार परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि मुलगी असून कुटुंबाचा आधारच हरपला आहे. शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ओलसर जमीन, खराब वायरिंग, मीटर पेटी आणि मोटर पंप यामुळे जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शेतात मोटर सुरू करताना अत्यंत काळजी घ्यावी, विजेची तपासणी तज्ज्ञांकडून करून घ्यावी आणि जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!