देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) केवळ शैक्षणिक गुणच नव्हे तर कल्पक गुणांना न्याय देत यशाची शिखरे विद्यार्थ्यांनी पार करावी, आजची परिस्थिती बघता विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आई-वडिलांच्या कष्टाची विद्यार्थ्यांसाठी गुरुजी घेत असलेल्या परिश्रमाची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपविभागीय महसूल अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी केले.
तालुक्यातील देऊळगाव मही येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जीवनसाथी फाउंडेशन व दंदाले हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1/2/3 शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आकांशा गाडेकर,सरपंच कमल शिंगणे, डॉ अलका गोडे,डॉ शिल्पा दंदाले . राऊत सर,बुरकुल, सर शेख जमीर यांच्या सह अन्य मंडळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रा खडसे म्हणाले कि इंग्रजी शिक्षण ग्रामीण भागातदेखील पोहोचले आहे. अगदी गल्ली बोळात या शाळा दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना या इंग्रजी शाळेच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकविणे फार आव्हानात्मक झाले आहे. शिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हळूहळू बदलत चालला आहे. इंग्रजी माध्यमातील शाळांनी उभे केलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचा दर्जा व गुणात्मक बदलासाठी देऊळगाव मही येथील जिल्हा परिषद शाळेतील अभियानाद्वारे अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांचेकौतुक केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील मतकर यांनी तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जीवनसाथी फाउंडेशनचे विश्वस्त जनार्दन टेकाळे, डॉक्टर महेश दंदाले, संजय कोठारी,संजय शिंगणे,संतोष जाधव, अमोल बोबडे, शिवाजी शिंगणे रवींद्र कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
जसा आकार द्याल तसे ते घडतील : मनीषा कदम
विद्यार्थी हे मातीच्या गोळ्या सारखे असतात त्या विद्यार्थ्यांना जसं आपण घडू तसे ते घडतात असं म्हटलं जातं की मनुष्य हा प्रतिकूल परिस्थितीतून ज्यावेळेस आपल्या ध्येय पूर्ण करतो ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तो जिद्दीला पेटलेला असतो आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असतो यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठीच मनाशी खून गाठ बांधून घ्यावी तेव्हा ते विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी बोलताना सांगितले.










