डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे कष्टाचे हळदीचे बेणे चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडून जवळपास महिना उलटला, मात्र ३० मे उजाडला तरी डोणगाव पोलिसांना चोरट्यांचा साधा सुगावाही लागलेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीसोबतच पोलिसांच्या संथ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विठ्ठल विश्वनाथ भुतेकर यांनी पेरणीसाठी राजेश सावजी यांच्या मालकीच्या गोदामात ९० हजार रुपये किमतीचे ३० क्विंटल हळदीचे बेणे साठवून ठेवले होते. ४ मेच्या सायंकाळी ६ ते ५ मेच्या पहाटे साडेपाच दरम्यान चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून हे बेणे लंपास केले. ५ मे रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. BNS कलम ३३४(१) आणि ३०५ नुसार गुन्हाही नोंदवण्यात आला. तपास हवालदार अरुण सानप यांच्याकडे देण्यात आला, मात्र अद्याप तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही.
यापूर्वी हिवरा साबळे येथील शेतकऱ्याचेही हळदीचे बेणे चोरीला गेले होते. एकापाठोपाठ एक चोऱ्या होत असताना पोलिसांची निष्क्रियता शेतकऱ्यांसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे.










