जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ ज्ञानदेव राजनकर) जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे ३५० वर्षांची ऐतिहासिक घटमांडणी आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज सायंकाळी ५:३० वाजता पार पडणार आहे. या पारंपरिक विधीमधून आगामी वर्षाचे पीक-पाणी, पाऊसमान, सामाजिक-राजकीय घडामोडी तसेच नैसर्गिक आपत्तींचे संकेत वर्तवले जातात.
पूर्णा नदीकाठी होणाऱ्या या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, बदलत्या हवामानाच्या आणि आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या भाकितांकडे अधिक उत्सुकतेने पाहिले जात आहे. इराण-अमेरिका तणावासारख्या जागतिक घडामोडींच्या संदर्भात काही संकेत मिळतात का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
परंपरेनुसार, दुसऱ्या दिवशी सूर्योदयावेळी या घटमांडणीचे अधिकृत भाकित जाहीर केले जाते. अनेक शेतकरी याच अंदाजांवर आपल्या वर्षभराच्या शेतीचे नियोजन करतात. त्यामुळे या परंपरेला ग्रामीण भागात मोठे महत्त्व आहे.
दुसरीकडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटमांडणीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे स्पष्ट करत टीका केली आहे. तरीही, श्रद्धा आणि परंपरेच्या जोरावर ही ३५० वर्षांची परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे.











