ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने आगामी सण आणि महापुरुषांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद येथे शांतता कमिटीची बैठक अत्यंत उत्साहात पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सामाजिक सलोखा आणि विधायक उत्सवावर भर देण्यात आला.या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, नायब तहसीलदार भरत किटे, आणि गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार नितीन कुमार पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रशांत तायडे यांनी प्रभावीपणे पार पाडले.बैठकीत मार्गदर्शन करताना अधिकाऱ्यांनी जनतेला आणि उत्सव समित्यांना काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना केल्या.महापुरुष सर्वांचेच: कोणत्याही महापुरुषाने एका विशिष्ट समाजासाठी कार्य केलेले नाही. त्यांचे कार्य संपूर्ण मानवजातीसाठी गौरवास्पद असून, सर्व समाजांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा. उत्सवांमध्ये डीजेवर होणारा अवाढव्य खर्च टाळून तो पैसा समाजाच्या विकासासाठी आणि लोकहिताच्या कामासाठी वापरावा.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि सोशल मीडियाच्या विळख्यातून त्यांची सुटका व्हावी, यासाठी ‘अठरा तास अभ्यास’ हा उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावरील सर्वच माहिती खरी नसते. अफवांवर विश्वास न ठेवता समाजात शांतता टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आपल्या राज्यघटनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हीच मूल्ये डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना लिहिली आहे. याच मूल्यांच्या आधारे देशाची प्रगती शक्य आहे.या सभेला भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, डॉ. सतीश शिरेकर, सुनिता हेलोडे, मंजूर खान, नगरसेवक सिद्धार्थ हेलोडे.व्यापारी संघटनेचे अजय वानखडे, पत्रकार संघटनेचे कैलास देशमुख व सहकारी पत्रकार,पंचायत समिती, नगरपरिषद, महावितरणचे कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या शांतता कमिटी सभेची सांगता करण्यात आली. या बैठकीमुळे शहरात सलोख्याचे वातावरण निर्माण झाले असून, आदर्श उत्सव साजरा करण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी केला आहे.











