बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आ. संजय गायकवाड यांनी बुलढाण्याचे खासदार तथा केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आ.गायकवाड यांनी सांगितले की, प्रतापरावांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून जयश्री शेळके यांना तिकीट मिळवून दिले?. त्यांनी मिलिंद नार्वेकरांना फोन करून उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवला होता की, बुलढाण्यात जयश्री शेळके यांना तिकीट द्यावे.
त्याचवेळी भाजपचे आमदार संजय कुटे यांनीही अनिल परब यांना फोन करून उद्धव ठाकरे यांना जयश्री शेळके यांचे तिकीट निश्चित करण्यासाठी आग्रह केला. परिणामी, रविकांत तुपकर यांचे तिकीट शेवटच्या क्षणी काढून टाकण्यात आल्याचा आमदार गायकवाड यांनी पत्रकारांसमोर आरोप केला की, या निवडणुकीत जिल्हा पातळीवरच्या कोणत्याही नेत्याने त्यांना मदत केली नाही.
गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, संजय कुटे यांनी योगेंद्र गोडे यांना रात्री दोन वाजता घरी बोलावून आ.संजय गायकवाड यांच्या प्रचारासाठी कमी काम करण्यास सांगितले. तसेच, आ.गायकवाड यांनी स्पष्ट केले की, लोकसभेत प्रतापरावांचा चेहरा मतदारांना पसंत नव्हता. “मी त्यांच्या निवडणुकीसाठी जीव ओतून काम केले. पाच ते पन्नास लाख रुपये स्वतःच्या खिशातून खर्च केले, तरीही खासदात जाधव यांनी जिल्ह्यात कोणतेच विकास कामे न करता त्यांना मत कमी पडल्याच ते बोलतात,” असे आ.गायकवाड म्हणाले.
या आरोपांमुळे बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण कडाक्याच्या थंडीत तापले असून, आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.











