मोताळा (हॅलो बुलढाणा) पावसातील दीर्घ खंडामुळे मोताळा तालुक्यातील खरीप पिकांवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांसमोर उत्पादन घटण्याचे संकट निर्माण झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद यांसह विविध पिकांना आवश्यक पाऊस न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मोताळा तालुकाप्रमुखांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील पिकांची गावनिहाय पाहणी करून वस्तुनिष्ठ सर्वेक्षण व पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
पर्जन्यमान व पिकांची स्थिती लक्षात घेऊन मोताळा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा. तसेच आणेवारी 25 पैशांच्या आत घोषित करून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्जवसुलीपासून दिलासा देण्यासाठी कर्ज परतफेडीस स्थगिती व आवश्यकतेनुसार कर्ज पुनर्गठनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. तसेच शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा आणि पशुधनासाठी चारा-पाण्याच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम वाढविण्याबाबत केंद्र शासनाकडे ठोस शिफारस करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी तालुकाप्रमुख विजय इंगळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, सामाजिक न्याय आघाडी प्रमुख जितेंद्र खराटे, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख मो.साबीर मो.शब्बीर, मोताळा तालुका युवा संघटक वैभव चव्हाण, विभाग प्रमुख सागर मेंढे, मनोज तायडे, निर्मलकुमार इंगळे, रवी तायडे, प्रकाश घोंगटे, प्रमोद शेळके, अक्षय जवरे, ज्ञानेश्वर कोळसे, शंकर पट्टे, गणेश पाटील, प्रवीण बोराडे, नसीम शेख बशीर, शिवद्य सहजे, गोपाल दिवाणे इत्यादींची उपस्थिती होती.












Total Users : 3416207