जानेफळ (हॅलो बुलढाणा/दीपक बनसोडे) चालता येत नाही.. बोलता येत नाही.. अन् स्वतःची काळजी देखील घेता येत नाही, अशा दिव्यांग स्वातीताईला शासनाकडून मिळत असलेला हक्काचा निधी प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे गत १२ महिन्यापासून मिळाला नाही.या लाभार्थीला वारंवार लाभासाठी किंवा आधार कार्ड अपडेटसाठी कधी मेहकर तर कधी बुलढाणा येथे येण्यास सांगितल्या जात असल्याने हे दुबळे प्रशासन तिच्या वेदनेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचा चिडखोर स्वर आता सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे आवळल्या जाऊ लागला आहे.
स्वातीताई जन्मताच दिव्यांग असल्याने तिचे संपूर्ण आयुष्यच पणाला लागले. असे परावलंबी, अवयव-बुद्धी-गती-मतीमधे असहकार असलेल्या ताईचा सांभाळ तिचे वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. नित्य नव्याने वेगवेगळ्या समस्येला ते सुद्दा आयुष्यभर तोंड देताहेत. असामान्य म्हणून जन्माला आलेल्या जिवाला सामान्य जिवन जगता येत नाही,यापेक्षा नियतीची क्रूर थट्टा कोणती असु शकेल? परंतु हातपाय आणि डोके शाबूत असलेल्या प्रशासनाला याचे काही सोयरंसुतक दिसून येत नाही.ताईच्या प्रशासकीय कामाला कोलदांडा देत सरकारी उंबरठे झिजवण्यासाठी भाग पाडणाऱ्या व दिव्यांग निधी पासून एक वर्ष वंचीत ठेवणाऱ्या या दुबळ्या प्रशासनाने क्रूर थट्टेची सिमा पार केल्याचा संताप आता व्यक्त होत आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी स्वातीताईला 10 ते 15 वेळा मेहकर किंवा बुलढाणा येथे चकरा माराव्या लागल्या.तिच्या वडिलांनी तिला तहसिल कार्यालयात नेण्यासाठी प्रत्येक वेळी खाजगी वाहन करून हजार रुपयाची आर्थिक झळ सोसली परंतू स्वातीताईचे आधार कार्ड अजून अपडेट झाले नाही. दरम्यान स्वातीताई च्या वेदनांवर न्यायिक फुंकर मारण्यासाठी कुणी अधिकारी पुढे येतो की नाही? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.













Total Users : 3392353