बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून देशात अराजकता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केला. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कथित अराजकवादी भूमिकेविरोधात शुक्रवारी, २४ जुलै रोजी भाजपा व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जयस्तंभ चौकातील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
आंदोलनाचे नेतृत्व करताना विजयराज शिंदे यांनी आक्रमक भाषेत काँग्रेसवर प्रहार केला. “राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून नव्हे, तर देशात गोंधळ निर्माण करणारे आंदोलनजीवी नेते म्हणून वागत आहेत. विद्यार्थ्यांच्या वेदनांवर उपाय शोधण्याऐवजी त्यांच्या भावनांचे राजकीय भांडवल करण्याचा काँग्रेसचा डाव आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
संसदेत चर्चेचे व्यासपीठ आणि सरकारची तयारी असतानाही चर्चा टाळून रस्त्यावर गोंधळ घालणे ही लोकशाही नसून लोकशाहीची थट्टा असल्याचे शिंदे म्हणाले. पंतप्रधानांच्या उच्च सुरक्षा क्षेत्राचा राजकीय प्रसिद्धीसाठी वापर करणे अत्यंत बेजबाबदार आणि निषेधार्ह असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी “राहुल गांधी मुर्दाबाद”, “काँग्रेस मुर्दाबाद” आणि “विद्यार्थ्यांच्या भावनांवर राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो” अशा घोषणांनी जयस्तंभ चौक दणाणून गेला.
जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद सातत्याने वाढविणारे, कार्यकर्त्यांना आक्रमकपणे एकत्र आणणारे आणि विरोधकांना थेट जाब विचारणारे नेतृत्व म्हणून विजयराज शिंदे पुन्हा एकदा आंदोलनाच्या केंद्रस्थानी दिसले. त्यांच्या धारदार भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.
आंदोलनात भाजयुमो जिल्हाध्यक्ष संतोष काळे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, सुनील देशमुख, शुभम देसाई यांच्यासह भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











