डोणगाव (हॅलो बुलढाणा) राज्य महामार्गावरील घाटबोरी वनपरिक्षेत्रांतर्गत असलेला वनउपज तपासणी नाका सध्या केवळ शोभेची वास्तू ठरत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. वनसंपत्तीची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या या नाक्यावर अधिकारी-कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याचे चित्र दिसत असल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तपासणी नाका अनेकदा रिकामा असतो. त्यामुळे लाकूड, सरपण आणि इतर वनउपजाची वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. भारतीय वन अधिनियम, १९२७ आणि महाराष्ट्रातील संबंधित वन नियमांनुसार वनउपज वाहतुकीची काटेकोर तपासणी करणे, परवान्यांची पडताळणी करणे आणि अवैध वृक्षतोड व तस्करीला आळा घालणे ही वनविभागाची थेट जबाबदारी आहे.
मात्र नाकाच निष्क्रिय असेल, तर तस्करांवर कारवाई करणार कोण? सरकारी वेतन घेणारे कर्मचारी नेमके कुठे असतात? उपस्थिती नोंदवही, वाहन तपासणी रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेजची चौकशी झाली, तर सत्य बाहेर येईल का?
वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी; अन्यथा वनसंपत्तीच्या संभाव्य लुटीला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.










