संग्रामपूर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील खिरोडा येथे अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या काळाबाजाराचा मोठा भांडाफोड झाला असून तब्बल ८ लाख ५८ हजार रुपयांचा संशयित बियाणे साठा जप्त करण्यात आला आहे. कृषी विभाग आणि तामगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही धडक मोहीम राबवली. या प्रकरणात तिघांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी फरार झाला आहे.
कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक रविकीरण नावकार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जळगाव जामोद-शेगाव मार्गावरून अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर खिरोडा येथील पूर्णा नदी पुलाजवळ सापळा रचण्यात आला. दुपारी साडेचारच्या सुमारास एमएच ३० बीडब्ल्यू ९५८५ क्रमांकाची मारुती ईको गाडी अडवून तपासणी केली असता त्यामध्ये ९ कट्ट्यांमध्ये भरलेले तब्बल ४५८ संशयित बियाण्यांचे पाकिटे आढळून आली.
‘DHOOM-2’, ‘IPL CHAMPION 5G’ आणि ‘PINKGUARD 4 20:20’ या नावाने विक्रीसाठी आणलेली ही बियाणे पाकिटे शासनमान्य नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पाकिटांवर उत्पादक, वितरक, किंमत, जीईएसी मान्यता क्रमांक यासारखी अत्यावश्यक माहितीच नव्हती. शेतकऱ्यांची फसवणूक करून जादा दराने विक्रीसाठी हा माल आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या कारवाईत गुलाबराव ठाकरे, शंकर दांदळे यांना ताब्यात घेण्यात आले असून विनोद पाटील उर्फ वाघमारे हा आरोपी फरार झाला. जप्त बियाण्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत










