जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा / ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील खेर्डा बु. येथील श्री लक्ष्मीनारायण भगवान मंदिर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीतमय श्रीमद भागवत कथेची सोमवारी (दि.२५ मे) भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण सांगता करण्यात आली. महाप्रसाद, काल्याचे कीर्तन आणि भव्य दिंडी सोहळ्यामुळे संपूर्ण गाव हरिनामाच्या रंगात रंगून गेले होते.
या सप्ताहात ह.भ.प. भागवताचार्य दिव्याताई मापारी खैरा आळंदीकर यांनी आपल्या सुमधुर वाणीतून श्रीमद भागवत कथेचे रसाळ निरुपण केले. दि.१८ मेपासून सुरू झालेल्या या धार्मिक सोहळ्यात दररोज पहाटे काकडा, विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन असे विविध कार्यक्रम भक्तिभावात पार पडले.
सोमवारी सकाळी झालेल्या काल्याच्या कीर्तनाला गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी निघालेल्या भव्य दिंडी सोहळ्यात टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. गाथा पारायणाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.
या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी निवाणा, रुधाना, वकाना, सुनगाव, सावरगाव तसेच पंचक्रोशीतील टाळकरी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले. महिला, युवक, बालगोपाल आणि ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सेवा दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिदास गिऱ्हे, मारुती वानखडे, दीपक येनकर, आत्माराम वानखडे, गजानन वेरुळकर, जयदेव वानखडे, परमेश्वर उगले यांच्यासह महात्मा फुले मंडळ व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.










