बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मध्यप्रदेशातील रीवा येथे घडलेल्या पूज्य आर्यिका माताजी दुर्घटनेनंतर देशभरातील जैन समाजात संतापाची लाट उसळली असून, बुलढाणा येथील दिगंबर जैन संस्था आता थेट आंदोलनाच्या भूमिकेत आली आहे. विहाररत जैन साधू-संत सुरक्षित नसतील तर देशातील अध्यात्म सुरक्षित कसे? असा थेट सवाल उपस्थित करत संस्थेने राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दि. २५ मे रोजी पाठविण्यात आलेल्या निवेदनात, २० मे रोजी रीवा जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेत पूज्य आर्यिकांचे निधन झाल्याचा उल्लेख करत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या घटनेमुळे जैन समाजात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, संतांच्या सुरक्षेबाबत शासन गंभीर नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जैन साधू-संत हे अहिंसा, संयम आणि तपश्चर्येचे प्रतीक आहेत. ते कोणतीही शासकीय सुरक्षा न घेता पायी विहार करतात. अशा परिस्थितीत त्यांच्या जीविताची जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे. देशभरातील विहाररत संतांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय संत सुरक्षा धोरण लागू करून विशेष सुरक्षा यंत्रणा उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.










