जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील राजुरा शेतशिवार रविवारी सकाळी अक्षरशः हादरून गेले. विजय मुसा किरडिया (वय 30) यांनी आपल्या चार निष्पाप चिमुकल्यांना विहिरीत टाकून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न करत मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना 25 मे रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये फिरीद विजय किरडिया (7), कु. प्राची (6), कु. पूर्वी (4) आणि पीयूष (2) या चार निष्पाप बालकांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, विजय किरडिया यांनी आधी चारही मुलांना विहिरीत फेकले. त्यानंतर विहिरीजवळील खिराडीला दोरी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोरी अचानक तुटल्याने ते थेट विहिरीत कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एचडीपीओ आनंद महाजन व पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, इतक्या टोकाच्या निर्णयामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे










