ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) गेल्या आठ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोनदा झालेली दरवाढ, गॅस सिलेंडर व खाद्यतेलाचे गगनाला भिडलेले भाव यामुळे सर्वसामान्यांचे, विशेषतः शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. या महागाईच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत, जळगाव जामोद तालुका ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षाच्या वतीने आज दिनांक २१ मे रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देऊन दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनात नमूद केल्यानुसार, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसतानाच दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांच्या कंबरड्यात मोडले आहे. शेती मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी डिझेल थेट कॅनमध्ये उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी शिवसेनेने केली आहे.केवळ महागाईच नव्हे, तर ‘नीट’ (NEET) परीक्षेतील गैरप्रकारात गुंतलेले महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस आणि पेपर फोडणाऱ्या (पेपर विकत घेणाऱ्या) पालक व विद्यार्थ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शिवसेनेने लावून धरली आहे.जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात राज्य सरकारला थेट इशारा देण्यात आला आहे.
जर वाढवलेले दर तत्काळ मागे घेतले नाहीत, तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांच्यासह जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, विधानसभा संघटक भिमराव पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, शहरप्रमुख रमेश ताडे, पुंडलिक पाटील,मो.फारुख,संजय दंडे, विशाल ताकोते, शांताराम धोटे, विशाल झाल्टे, गजानन मांडेकर, संतोष डब्बे, जगन्नाथ गाडगे, पांडुरंग उगले, कैलाससिंह राजपुत,प्रतिक उमाळे, शेरसिंग सोळंके, अजिंक्य राजपुत, सुनील मोरखडे, विजय भालतडक, वैभव हांडे, रमेश हागे, निलेश दलाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










