बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ज्या मातीत छत्रपती शिवरायांच्या विचारांची ज्योत पेटती ठेवली पाहिजे, त्याच भूमीत आज लोकशाहीचा गळा घोटणारी घटना घडली. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शांततामय वाचनासाठी जमलेल्या आंदोलकांवर बुलढाणा पोलिसांनी अक्षरशः दंडुकेशाही चालवत त्यांना गुन्हेगारांप्रमाणे उचलून नेले. विचार मांडणं आणि पुस्तक वाचणं हा गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनासाठी राज्यभरातून शिवप्रेमी बुलढाण्यात दाखल झाले होते. जिजामाता प्रेक्षागार मैदानावर हातात पुस्तके घेऊन शांततेत आंदोलन करणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने हटवले. प्रकाशक प्रशांत आंबी यांना सकाळीच चिखलीतून ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कारवाईवर संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे.
विशेष म्हणजे, ४३ अंशांच्या प्रचंड उष्णतेत महिला आणि तरुणी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मात्र, त्यांच्या संरक्षणासाठी उभारलेला मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पोलिसांनी निर्दयीपणे हटवली. सावली आणि पाण्यापासून वंचित ठेवत आंदोलन मोडून काढण्याचा हा अमानुष प्रकार संतापजनक आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईने पोलिस प्रशासनाचा कठोर आणि असंवेदनशील चेहरा उघड केला आहे. लोकशाहीत शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार असताना, बुलढाण्यात मात्र बळाचा वापर करून तो चिरडला गेला.
आजची ही घटना केवळ आंदोलन मोडण्याची नाही, तर विचार दडपण्याची आहे. बुलढाणा पोलिसांच्या या अरेरावीविरोधात जनतेच्या मनात संतापाचा ज्वालामुखी धुमसत असून, या घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत आहे.











