लाखणवाडा (हॅलो बुलढाणा) भारतीय समता संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण खामगाव तालुक्यातील गायरान व वनजमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन छेडले आहे.
आंदोलनस्थळी तहसीलदार यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर भारतीय समता संघटनेचे शिष्टमंडळ खामगाव तहसील कार्यालयात गेले असता, मागण्या मान्य असल्याबाबत लेखी पत्र देण्यास तहसीलदार यांनी नकार दिल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तसेच, “मी पत्र देऊ शकत नाही; वाटेल तेवढे दिवस तुम्ही उपोषण करू शकता,” अशा स्वरूपाची भूमिका तहसीलदारांनी घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे सांगितले जाते आणि दुसरीकडे त्याबाबत लेखी आश्वासन देण्यास टाळाटाळ केली जाते, ही बाब गंभीर आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ठोस, स्पष्ट आणि लेखी आश्वासन मिळेपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, अशी भूमिका भारतीय समता संघटनेने जाहीर केली आहे. खामगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन भारतीय समता संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.










Total Users : 3285563