बुलढाणा (हॅलो बुलढाणा/जितेंद्र कायस्थ) अखेर बराच काळ चर्चेत असलेली भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युती बुलढाण्यात कोसळल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी एकत्र बसण्याऐवजी आता स्वतंत्र मार्ग धरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे घेतलेल्या पश्चिम विदर्भ आढावा बैठकीत स्पष्ट भूमिका मांडली.जिथे शक्य आहे तिथे युती करा, नाहीतर स्वबळावर लढा, पण मित्र पक्षांवर टीका करू नका.या वक्तव्याने फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांच्या हाती निर्णय दिला असला तरी बुलढाण्यातील भाजप-शिवसेना समीकरण आता पूर्णतः ढासळल्याचे संकेत आहेत.
कालच शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये दोन्ही पक्षांचे स्वतंत्र कार्यक्रम पार पडले. मात्र कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यक्रमाकडे फिरकलेही नाही, हेच दाखवते की युतीचा पाया आता कोसळला आहे. दोन्ही पक्षांतली दूरावा आणि अविश्वासाची दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची मोहीम जोमात सुरू आहे, तर फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर विजय मिळवा! असा दमदार संदेश दिला आहे. दुसरीकडे शिवसेनाही (शिंदे गट) स्थानिक पातळीवर आपल्या ताकदीचा हिशोब मांडण्याच्या तयारीत आहे.राजकीय तज्ज्ञांच्या मते, बुलढाण्यातील ही वेगळी वाट निवडणुकीला अधिक चुरस देणार आहे. युतीऐवजी स्पर्धा! आणि दोन्ही पक्ष आमनेसामने — त्यामुळे या वेळी बुलढाण्यात राजकीय रणांगण तापणार हे नक्की!











