किनगावराजा (हॅलो बुलडाणा) ग्रामपंचायतने सुरु केलेल्या आरो एटीएमचे पाणी शुद्ध की अशुद्ध? असा प्रश्न एका वृत्तपत्राने उपस्थित केल्याने सदर एटीएमचे पाण्याचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून,वैद्यकीय अहवालानंतर आरो फिल्टर यंत्र सुरु होणार आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना साथीचे रोग होत असल्याची बातमी एका दैनिकात राजकीय द्वेषातून प्रसिद्ध करण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय तपासणीत ग्रामपंचायत व गावातील काही खाजगी जलस्त्रोत हे अशुद्ध व पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले होते.आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार किनगाव ग्रामपंचायतने तात्काळ जलस्त्रोतांचे शुध्दीकरण करून पुन्हा सर्व पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, बुलढाणा येथे पाठवले आहेत.
या संदर्भात सरपंच प्रकाश मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली २७ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामपंचायतीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यावेळी उपसरपंच अर्चना दत्तात्रय झोरे, सदस्य संतोष काकड, योगेश चतुर, व इतर सदस्य तसेच आरोग्य सहाय्यक चंद्रहास खरात या वेळी उपस्थित होते. यावेळी सरपंच मुंढे यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतने गावातील नागरिकांसाठी आरो फिल्टर एटीएम मशीन बसवले असून, २५ मे रोजी त्यास जंतुनाशक किट बसवण्यात आले आहे. त्याशिवाय गावातील विहिरींचे जलशुद्धीकरणही आरोग्य विभागाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त होताच एटीएम पुन्हा सुरू करण्यात येईल.” तसेच ग्रामसेवक अमोल पुंजाजी मेहेत्रे यांनी देखील सांगितले की, सर्व जलस्त्रोत स्वच्छ करून त्याचे नमुने पुन्हा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक शेख नईमुद्दीन शेख हयात यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीच्या आरो एटीएम मधील पाणी आम्ही पिलं असून आम्हाला कोणताही त्रास झाला नाही.”
तर मधुकर साळवे यांनी पाणी उपयुक्त असल्याचे सांगून, “ग्रामपंचायतचे आभार मानतो की त्यांनी शुद्ध पाणी स्वस्त दरात उपलब्ध करून दिले,” असे मत व्यक्त केले.
विठ्ठल कुंडलिक चौरे यांनीही आरो मशीन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. या पत्रकार परिषदेस गावातील नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकमताने ग्रामपंचायतने केलेल्या जलसुरक्षेच्या उपाययोजनांचे स्वागत केले व आरो एटीएम यंत्र त्वरित सुरू करण्याची मागणी केली.तर किनगाव राजा गावात दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ पावले उचलत, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसवलेली आरो फिल्टर एटीएम मशीन तात्पुरती बंद केली आहे.
ग्रामपंचायत सरपंच प्रकाश मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आरो मशीन बसवण्यात आले होते. यामधून नागरिकांना अत्यंत नाममात्र दरात शुद्ध पाणी मिळत होते. मात्र, आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालात पाणी स्त्रोतात अशुद्धता आढळल्याने तात्काळ जलशुद्धीकरण करून पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. जोपर्यंत प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल ‘पिण्यायोग्य’ असल्याचे स्पष्ट करत नाही, तोपर्यंत ही मशीन बंद ठेवण्यात येणार आहे.”
या पृष्ठभूमीवर किनगाव राजा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर चाटे यांनी सांगितले की, “आरो मशीन हे फक्त खाऱ्या पाण्यातील क्षार काढून गोड पाणी करते, मात्र पाण्यातील जैविक जंतू व जीवाणूंना नष्ट करत नाही. त्यामुळे या मशीनमधून येणारे पाणी पूर्णपणे शुद्ध आहे, असे निश्चितपणे सांगता येत नाही.” ग्रामपंचायतीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जलस्रोताचे शुद्धीकरण करण्यात आले असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच आरो मशीन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता ग्रामपंचायतीशी थेट संपर्क साधावा व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.