बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बुलढाणा जिल्हा आभार दौऱ्यावर असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या ॲड.जयश्रीताई शेळके यांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे. ‘आभार कसले मानता माफी मागा!’मनात येईल तर जनता माफ करू शकते,हा जनतेचा विचार आहे,असे त्यांनी ठणकावले!
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जिल्ह्याच्या आभार दौऱ्यावर आहेत.बुलढाणा जिल्हा हा गरीब कुटुंबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.या जिल्ह्यातील स्वर्गीय कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने शेतीला पाणी देत नसल्यामुळे आत्महत्या केली. या घटनेने देशात पडसाद उमटले.मात्र सरकार शेतकऱ्यांसाठी असंवेदनशील ठरले. जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी कर्जमाफी मागत आहेत परंतु राज्य शासन कर्ज माफी तसेच हमीभाव देऊ शकत नाही.2023 -24 चा पीक विमा अद्यापही अनेकांना मिळाला नाही.त्यामुळे तरुण पिढी हाताला काम नसल्याने स्थलांतर करत आहे.प्राथमिक शिक्षण किंवा आरोग्य व्यवस्था ढासाळलेली आहे.निवडणुकीत कमी मताने का होईना शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी निवडून आले.परंतु हे लोकप्रतिनिधी शिवीगाळ व दादागिरी करण्याशिवाय कुठलेही काम करताना दिसत नाही.त्यामुळे “उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आभार कसले मानावे?” असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे.