बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी सभागृहात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत अमरावती विभागातील भूजल पातळी आणि GSDA (Groundwater Survey and Development Agency) च्या जाचक अटींवर शासनाला धारेवर धरले.
शेतकऱ्यांना विहिरी मंजूर होत नाहीत, पण समूहगटासाठी अटी शिथिल? असा प्रश्न उपस्थित करत GSDA च्या 2011-12 च्या सर्वेनुसार, अमरावती विभागात भूजल पातळी 1000 फूटांच्या खाली गेली आहे. यामुळे शासनाच्या कोणत्याही योजना त्या भागात लागू करता येत नाहीत, मात्र समूहगटाच्या विहिरींसाठी ही अट लागू होत नाही. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, असे गायकवाड यांनी अधोरेखित केले. सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेणार कधी? या गंभीर प्रश्नावर उत्तर देताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कोणतेही स्पष्टीकरण न देता जीएसडीएची अट काढता येणार नाही, असे सांगितले. यामुळे सभागृहात मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान शेतकऱ्यांचा मुद्दा असंवेदनशीलपणे फेटाळला गेला, यावर संतप्त प्रतिक्रिया देताना आमदार संजुभाऊ गायकवाड म्हणाले की, “शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. GSDA ची ही अट रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील!”
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? GSDA च्या जाचक अटी शिथिल होतील का? यावर आता राज्य सरकार पुढील काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.