बुलढाणा (हॅलो बुलडाणा) उन्हाळ्यात पाणीटंचाई वाढेल असा, प्रकार मेहेकर तालुक्यातील लोणी गवळी येथे जलजीवन मिशनअंतर्गत झालाय!तब्बल ४ कोटी ५६ लाख रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेतील भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत अडीच कोटी रुपये खर्चूनही योजना अपूर्ण असून, पाणी शुद्धीकरण केंद्राच्या खोलीचा दारूच्या पार्ट्यांसाठी वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या खोलीत देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, बिसलेरी बॉटल आणि चखण्याचे साहित्य आढळले. सार्वजनिक निधी पाणी पुरवठ्यासाठी वापरण्याऐवजी तो अवैध धंद्यांना चालना देण्यासाठी खर्च केला जात आहे का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांची याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
या गैरप्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शुद्ध पाणी मिळावे म्हणून नागरिक वाट पाहत असताना जलशुद्धीकरण केंद्र दारूच्या अड्ड्यात रूपांतरित होत असेल, तर हा निधी कुणाच्या खिशात जातोय? हे तपासण्याची गरज आहे. प्रशासन या प्रकाराकडे डोळेझाक करणार की ठोस कारवाई करणार?