लोणार (हॅलो बुलडाणा / संदीप मापारी) पैशाची लालसा.. मग काय? ट्रक लुटण्याच्या उद्देशाने ट्रक चालकाचा खून केला व ट्रकचालकाचा मृतदेह ट्रक मधील टूल बॉक्स मध्ये टाकला.. आणि ट्रक घेऊन धूम ठोकली..ती ट्रकमधील लोखंडी साहित्य विकण्यासाठी! दरम्यान या थरारातही तो प्रेयसी सोबत मोबाईलवर गूलूगुलू बोलत होता… अचानक मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून त्याने खून केलेल्या ट्रक चालकाच्या फोनवरून प्रेयसीशी बोलणे सुरु ठेवले.नंतर हाच मोबाईल त्याच्यासाठी बेड्या ठरल्या!
लोणार तालुक्यातील सुलतानपूरचा खूनी गणेश वसंता पवार याच्यासह २ जणांच्या छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मूसक्या आवळल्या आहे.गणेश गजानन कुटे (सुलतानपुर) आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ (रा. गायखेडा, ता.लोणार असे या आरोपींची नावे आहेत.ट्रक चालक विजय मुरलीधर राऊत (५२, रा. केडगांव, अहिल्यानगर) याचा तिघांनी निर्घृण खून केला आहे. छत्रपती संभाजी नगर मधील आडगांव बुद्रूक मध्ये सोलापूर धुळे महामार्गावर एक ट्रक बेवारस अवस्थेमध्ये आढळला होता. पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकच्या टूल बॉक्समध्ये राऊत यांचा मृतदेह आढळला. मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या. त्यामुळे ट्रकचालकाचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. ट्रक मध्येच पोलिसांना राऊत यांचा मोबाईल देखील सापडला. या मोबाईल वरून एकाच व्यक्तीला ११ कॉल गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपास चक्र फिरवले असता, पोलिसांनी सुलतानपूरच्या गणेश पवार याला अटक केली. आधी उडवा उडवी ची उत्तरे देणाऱ्या गणेशने नंतर मात्र खुनाची कबुली दिली.
छत्तीसगडमधील रायपूर मध्ये विजय राऊत यांनी ट्रक मध्ये लोखंड भरले.ते घेऊन ते अहिल्यानगरला येणार होते. रायपूरमध्येच बदली चालक म्हणून काम करणाऱ्या गणेश पवारने विजय राऊत यांना मेहकर पर्यंत सोडण्याची विनंती केली. १९ जानेवारीला ते रायपूर मधून निघाले.सोमवारी सकाळी १० वाजता विजय राऊत आणि गणेश पवार यांनी कारंजा मध्ये नाष्टा केला. त्यानंतर स्वतः गणेश पवारने ट्रकचे स्टेरिंग हाती घेत विजय राऊत यांना आराम करायला सांगितले. विजय राऊत झोपेत असतानाच गणेश पवारने टॉमी ने डोके ठेचून राऊत यांची हत्या केली. गणेश ट्रक घेऊन मेहकर जवळ आला, तिथे त्याचे मित्र घायाळ आणि कुटे त्याला मिळाले.मेहकर मध्येच त्यांनी ३० हजारात ३० क्विंटल सळ्या विकल्या. त्यानंतर तिघेही ट्रक घेऊन जालन्याच्या दिशेने निघाले. जालन्यात त्यांना खरेदीदार मिळाला नाही. म्हणून ते छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने निघाले.दरम्यान पोलिसांनी तपास यंत्रणा लावून तिघांनाही अटक केली आहे.










