बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ईव्हीएम मशीन खात्रीशीर आहे का? हा एक प्रश्न सध्या चर्चेत असून अपयशाचे खापर देखील ईव्हीएमवर फोडले जात आहे. दरम्यान बुलढाणा विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना काट्याची टक्कर देणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांचा निसटता पराभव झाल्याने त्यांनी 5 बुथच्या ईव्हीएम फेर पडताळणीची मागणी केली आहे.यासाठी शेळके यांनी 2 लाख 36 हजार रुपये शुल्क भरले आहे.विशेष म्हणजे निवडणुकीनंतर 7 दिवसाच्या आत शेळके यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.
ईव्हीएम फेरपडताळणी साठी जे 5 बुथ रँडमली निवडण्यात आले आहे त्यात बुथ नं.13, झेडपी हायस्कूल रुम नं. 2,कोथळी, बुथ नं. 105,झेडपी हायस्कूल रुम नं. 1कोथळी,
बुथ नं. 116, झेडपी हायस्कूल शिरवा, बुथ नं. 214,आरास ले आऊट, बुलढाणा तर बुथ नं. 220,भिलवाडा मिल्ट्री प्लॉट रामदास भोंडे नगर पालिका शाळा रुम नं.2 चा समावेश आहे.
या 5 बुथची पडताळणी आता पुन्हा होणार आहे.निवडणुकीत केवळ 841 मतांनी पराभूत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी ईव्हीएम फेर पडताळणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे शुल्क भरून रेटली आहे. आता पडताळणी दरम्यान प्रथम मशीनची तांत्रिक तपासणी करण्यात येवून त्यानंतर सदर मशीनमध्ये नव्याने डमी मतदार घेवून ते उपस्थित प्रतिनिधींसमोर मोजण्यात येवून मशीनची ही पडताळणी पुर्ण केली जाणार असल्याचे समजते. व्हीव्हीपॅट चिठ्यांची तपासणी किंवा ईव्हीएमची फेरतपासणीचे अधिकार हे केवळ न्यायालयाला आहे. एखाद्या उमेदवाराने निकाल घोषीत झाल्यावर 45 दिवसांच्या आत न्यायालयात दाद मागितल्यास न्यायालयात सुनावणी होवून न्यायालय तशा प्रकारचा निर्णय देऊ शकते.