बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आसमानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाठीमागे दत्त म्हणून उभे ठाकले असून,18 व 19 ऑक्टोबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 72 गावे बाधित झाल्याने 18924 शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा फटका बसला आहे. तब्बल 15233.70 हेक्टर क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन, कपाशी,मका व भाजीपाला उध्वस्त झाला.सर्वाधिक खामगावातील 55 गावे तर त्या पाठोपाठ चिखली येथील 11 गावी आणि मेहकर येथील 6 गावे अवकाळी पावसामुळे बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
जिल्ह्यात 9 ते 14 ऑक्टोंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 577 गावांतील 147015.65 हेक्टर पिक पाण्याखाली गेले होते.त्यामुळे तब्बल 129511 शेतकऱ्यांना या पिक नुकसानीचा तडाखा नुकताच बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस सुरू असून 11 ऑक्टोंबर रोजी तर जिल्ह्यातील 29 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी,तूर, मका व भाजीपाला पिके पाण्याखाली आले. दरम्यान मोताळा मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद सुद्धा झाली. 14 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील
तब्बल 577 गावांतील 147015.65 हेक्टर पिक उध्वस्त झाले असून याचा तडाखा तब्बल 129511 शेतकऱ्यांना बसला.दरम्यान 18 व 19 ऑक्टोंबर रोजी अवकाळी पावसाने पुन्हा थैमान घालून 72 गावातील 15233.70हेक्टर क्षेत्रावर पाणी फेरले आहे.एकीकडे राजकीय नेते निवडणुकीत गुंग असल्याचे दिसून येत असून शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला नसल्याचे चित्र आहे.परिणामी अगदी जवळ येऊन ठेपलेली शेतकऱ्यांची दिवाळी किर्र अंधारात जाणार असल्याची भीती बळावली आहे.












