जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) पावसाने तब्बल ३० ते ३५ दिवसांपासून दडी मारल्याने शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. अशा संकटाच्या काळात महावितरणने कृषिपंपांचा वीजपुरवठा रात्री सुरू करून शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळू नये, असा आक्रमक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने दिला आहे. जामोद, वडशिंगी व खेर्डा सर्कलमधील गावांना सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अखंडित वीजपुरवठा द्यावा, या मागणीचे निवेदन महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
यावर्षी पुरामुळे परिसरातील शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पावसाने ताण दिल्यामुळे उरलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मे महिन्यापासून शेतीपंपांना दिवसा वीज मिळत होती; मात्र ऑगस्टपासून अचानक वेळापत्रक बदलून रात्री वीज देण्यात येत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
सावरगाव, पिंपळगाव आणि आसलगाव परिसरात अजूनही दिवसा वीजपुरवठा सुरू असताना जामोद, वडशिंगी व खेर्डा भागावरच अन्याय का, असा संतप्त सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. पुरानंतर शेतांमध्ये गवत, काटे, साप-विंचवांचा प्रादुर्भाव वाढला असून रात्री सिंचनासाठी जाणे म्हणजे शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रसन्नजीत पाटील , वर्षाताई वाघ, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, विश्वासराव भालेराव,इरफान खान, सिद्धार्थ हेलोडे, रामेश्वर मानकर, पंजाबराव वाघ, आशिष वायझोडे,दत्तात्रय डीवरे, सोपान आटोळे, डिगांबर तिजारे,तेजराव घुले, शत्रुघ्न कोकाटे, सुहास वाघ, अतुल मानकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दिवसा वीज सुरू न झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.













Total Users : 3394583