चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) खाामगाव–जालना बायपासवर आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक वेगळाच आणि अंगावर शहारे आणणारा अपघात घडला. देऊळगाव महीकडून बुलढाण्याच्या दिशेने येणाऱ्या एका टिप्परसमोर अचानक शाळेची बस आल्याने काही क्षणांत मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, स्कूल बसला धडक बसू नये आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी टिप्परचालकाने प्रसंगावधान राखत जोरदार ब्रेक लावला. त्यानंतर टिप्पर रस्त्याच्या एका बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात टिप्परचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखो रुपयांचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुदैवाने या अपघातात स्कूल बसमधील विद्यार्थी तसेच दोन्ही वाहनचालक सुरक्षित असल्याची माहिती आहे. घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
हा अपघात कोणाच्या निष्काळजीपणामुळे नव्हे, तर अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे आर्थिक नुकसान स्वीकारणाऱ्या टिप्परचालकाच्या प्रसंगावधानाचे परिसरात कौतुक होत आहे.










