खामगाव (हॅलो बुलढाणा) खामगाव मतदारसंघासह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. या गंभीर प्रश्नावर खामगाव मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आक्रमक भूमिका घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निवेदन दिले.
निकृष्ट दर्जाचे बियाणे बाजारात विकून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या संबंधित कंपन्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आकाशदादांनी केली. बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा, वेळ आणि संपूर्ण हंगाम धोक्यात आला असून, पंचनाम्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.










