डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) अन्न व पुरवठा विभागाचे अधिकारी तपासणी व कारवाईसाठी डोणगावात येत असल्याच्या अफवेने सोमवारी बाजारपेठेत चांगलीच खळबळ उडाली. ही चर्चा वाऱ्यासारखी पसरताच काही व्यापाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी घाईघाईने दुकाने, पानटपऱ्या बंद करण्यास सुरुवात केली. नेहमी गजबजणारी बाजारपेठ काही मिनिटांतच ओस पडली.
विशेष म्हणजे, काही दुकानदारांनी दुकानात असलेल्या ग्राहकांनाही बाहेर काढून थेट शटर खाली ओढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. “छापा पडणार” या एका चर्चेने व्यापाऱ्यांमध्ये एवढी भीती का पसरली? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नियमाने व्यवसाय करणाऱ्यांना तपासणीची भीती नसावी; मग एवढी धावाधाव नेमकी कशासाठी? अशी उलटसुलट चर्चा बाजारपेठेत रंगली.
सुमारे दोन तासांनी ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट होताच व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि दुकाने पुन्हा सुरू झाली. मात्र या प्रकाराने डोणगाव बाजारपेठेत पारदर्शक व्यवहारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.










