संग्रामपूर (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) तालुक्यात गुरुवारी दुपारी अचानक एकच खळबळ उडाली. “राज्य उत्पादन शुल्क आयुक्त तुकाराम मुंडे यांचे पथक तालुक्यात दाखल झाले”, “अन्न भेसळ विभागाची धाड पडणार” अशी वार्ता वाऱ्यासारखी पसरताच संग्रामपूरसह वरवट बकाल, टुनकी, सोनाळा परिसरातील बाजारपेठेत अक्षरशः धावपळ उडाली. काही क्षणांत हॉटेल, खानावळ, पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि लहान-मोठ्या व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली.
नेमकी धाड कुठे पडणार? कोणावर कारवाई होणार? पथक आले आहे की नाही? याची कोणालाही स्पष्ट माहिती नव्हती. मात्र, तुकाराम मुंडे या नावाचा धाक इतका जबरदस्त ठरला की, कोणतीही अधिकृत नोटीस नसताना बाजारपेठ काही काळासाठी बंदसारखी झाली. रस्त्यावर शुकशुकाट, दुकानांना कुलूप आणि व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर धास्ती, असे चित्र दुपारच्या वेळेत पाहायला मिळाले.
संग्रामपूर तालुका कडक अधिकाऱ्यांच्या वचकासाठी यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या धडक कारवायांमुळे गुन्हेगारीला चांगलाच चाप बसला होता. त्यानंतर आता तुकाराम मुंडे यांच्या नावाने पुन्हा एकदा प्रशासनाचा धाक काय असतो, याचा प्रत्यय नागरिकांना आला.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक कार्यालयाकडून गुरुवारी कोणतीही अधिकृत धाड किंवा तपासणी मोहीम राबवण्यात आल्याचे स्पष्ट झालेले नाही.












