मेहकर (हॅलो बुलढाणा /अनिल राठोड) तालुक्यात १ जून रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. या नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतातील महागड्या मालमत्तेलाही बसला आहे. मोहना खुर्द येथील शेतकरी अमोल जनार्धन खरात यांच्या शेतातील सौर ऊर्जा पॅनेल वादळात पूर्णपणे उखडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
खरात यांच्या गट क्रमांक ६ मधील ‘जनुना न शेंदला’ शेत शिवारातील विहिरीवर बसवलेले सोलर पॅनेल जोरदार वाऱ्याने खाली कोसळले. पॅनेलचे पत्रे, स्ट्रक्चर आणि बसवणीचे साहित्य मोडून चक्काचूर झाले असून, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
आधीच अवकाळी पाऊस, वादळ आणि शेती खर्चाच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी अमोल खरात यांनी केली आहे.










