देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) आधी पगार द्या, मगच काम! असा इशारा देत देऊळगाव मही ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. ‘हॅलो बुलढाणा’ने काही तासांपूर्वी २७ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याची धक्कादायक बातमी प्रसारित करताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि अवघ्या काही तासांत आंदोलनावर तोडगा निघाला.
२५ मे २०२६ पासून सुरू असलेल्या कामबंद व पाणीपुरवठा बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले होते. नागरिकांमध्येही तीव्र नाराजी पसरली होती. अखेर आज २६ मे रोजी प्रशासन व कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कर्मचाऱ्यांना तत्काळ तीन महिन्यांचे पगार देण्यात आले असून उर्वरित दोन महिन्यांचे पगार व कोरोना काळातील थकीत भत्ता ५ जून २०२६ रोजी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
हे आंदोलन सोडविताना प्रशासक सौ. जोत्सना वसुदेव शिंगणे, ग्रामपंचायत अधिकारी वसंतराव चेके, शेख मुस्लिम शेख अहमद, विजयराज रामकिसन शिंगणे, राजेंद्र अरुणराव शिंगणे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सन्माननीय रियाज का पठाण, पत्रकार सुनीलभाऊ मतकर, संतोषभाऊ जाधव तसेच ग्रामस्थांचे विशेष आभार मानले. आमच्या न्यायाच्या लढ्याला ‘हॅलो बुलढाणा’ने दिलेला आवाज निर्णायक ठरला, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘हॅलो बुलढाणा’च्या बातमीचा हा दिवसातील दुसरा पुन्हा जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळाल्याने जिल्हाभर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.










