चिखली (हॅलो बुलडाणा) तालुक्यात गाजत असलेल्या ५ कोटी २५ लाखांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणात आता मोठी प्रशासकीय हालचाल सुरू झाली आहे. ‘हॅलो बुलढाणा’ने या प्रकरणाचा पर्दाफाश करताच मुद्रांक विभागाने थेट संबंधितांना नोटीस बजावत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
केळवद येथील तब्बल ६ हेक्टर ९२ आर जमिनीच्या व्यवहारात मोठा ‘गेम’ झाल्याचा आरोप तक्रारदार सुधाकर खरात यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनुसार, १६ मे २०२४ रोजी ५.२५ कोटी रुपयांचा नोटरी करार करण्यात आला होता. त्यावेळी तब्बल १ कोटी ७५ लाख रुपये अॅडव्हान्स दिल्याचाही दावा करण्यात आला. मात्र पुढे २२ डिसेंबर २०२५ रोजी नोंदवलेल्या खरेदीखतात फक्त १ कोटी रुपयांचाच व्यवहार दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.
या कथित व्यवहारामुळे शासनाचे तब्बल २१ लाख २० हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ‘हॅलो बुलढाणा’ने हे प्रकरण जोरदारपणे उचलून धरल्यानंतर सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधितांना २ जून २०२६ रोजी सुनावणीसाठी समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मूळ दस्तऐवज सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात आता प्रशासन कोणावर कारवाई करणार? शासन महसुलाला खरोखरच फटका बसला का? आणि या व्यवहारामागे नेमकं कोणाचं संरक्षण आहे? याबाबत जिल्हाभरात जोरदार चर्चा रंगली असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










