ज.जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) “त्या काळात आजसारखे मल्टिमीडिया नव्हते, पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील जिव्हाळा, आपुलकी आणि भावनिक नाते खूप घट्ट होते. विशेष म्हणजे ते नाते आजही तितक्याच ताकदीने टिकून आहे,” असे भावनिक उद्गार जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक हेंडवे सर यांनी काढले.
पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या १९९३ ते १९९९ या कालावधीतील पाचवी ते दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा नुकताच शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. तब्बल ३० वर्षांनंतर जुने मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने परिसरात आठवणींचा गारवा निर्माण झाला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि जुन्या आठवणींची चमक दिसून येत होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सागरकुमार झनके यांनी स्वागत गीत सादर केले, तर प्रास्ताविक डॉ. पुरुषोत्तम अवचार यांनी केले. यावेळी उपस्थित गुरुजनांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी शिक्षण अधिकारी ब्राह्मणे यांच्यासह सुरळकर, मरमट, धाडे, वायाळ, आल्हाट, डी.आर. इंगळे, मेटांगे, जी.टी. चव्हाण, गावंडे, जावळेकर, नाफडे मॅडम, वाढीले मॅडम, वानखडे, घोगले आदी शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
मुख्याध्यापक हेंडवे यांनी जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करत, विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना घराघरात जावे लागते; मात्र आपल्या शाळेची परंपरा आजही प्रेरणादायी आहे, असे सांगितले.
यावेळी किशोर सुलताने व योगिता अवचार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदभाऊ कावरे व सागरकुमार झनके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. चंद्रकांत खोद्रे यांनी मानले. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.










