चिखली (हॅलो बुलडाणा /सय्यद साहिल) शहरातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप करत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ तात्काळ थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा कंत्राटदार अत्यंत निष्काळजीपणे काम करत असून जुन्या पाइपलाइनद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. काही भागात आठ दिवसांनी तर काही ठिकाणी तब्बल वीस दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुसरीकडे शहरातील कचरा व्यवस्थापनही पूर्णपणे कोलमडले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक कचरा गाड्या नादुरुस्त असून कंत्राटी सफाई कर्मचारी केवळ कागदोपत्री काम करत असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला. शहरातील नालेसफाई नियमित होत नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनावर डॉ. इसरार, निलेश गावंडे, डॉ. प्रकाश शिंगणे. आनंद बोन्द्रे . उबेद अली खान. रणदीप शिनगारे, मीनल गावंडे, अमोल लहाने, गोकुळ शिंगणे, गोपाल देव्हडे, प्रशांत भटकर, संतोष देशमुख, पी एस वायाळ, मोहम्मद आसिफ, समीर जकाउल्लाह यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षन्या आहेत










