जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) येथील दुय्यम निबंधक (श्रेणी-२) सुनील चव्हाण यांच्या कारभाराविरुद्ध आता तीव्र संताप व्यक्त होत असून, त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा अवैध गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. दलाल आणि वेंडरच्या माध्यमातून बनावट दस्तऐवज तयार करून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचा गोरखधंदा येथे सुरू असल्याचा गंभीर आरोप उबाठा शिवसेना (जिल्हा प्रमुख गजानन नामदेवराव वाघ) यांच्या लेटरहेडवरून करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार दाखल करण्यात आली आहे.या तक्रार पत्रात सह दुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांच्यावर अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जळगाव जामोद शहरात कार्यरत असल्यापासून सह दुय्यम निबंधक चव्हाण यांनी दलालांना हाताशी धरून ज्यांच्या नावावर भूखंड (प्लॉट) नाहीत, अशा बोगस व्यक्ती उभ्या करून बनावट खरेदीखत तयार केल्याचे समोर आले आहे.
हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा चक्क एका मृत (मेलेल्या) व्यक्तीच्या नावावर खरेदी करून देण्यात आली! इतकेच नव्हे तर, एका शेतजमिनीच्या व्यवहारात मानसिकदृष्ट्या अक्षम (पागल) असलेल्या व्यक्तीकडूनही खरेदीखत लिहून घेतल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार या कार्यालयात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.यापूर्वी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये सह दुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, त्यांनी उच्च न्यायालयातून (हायकोर्ट) चुकीच्या पद्धतीने आपले नाव रद्द करून घेतल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच, मनीष गांधी नावाच्या व्यक्तीनेही चव्हाण आणि इतर पाच जणांविरुद्ध ४२० चा गुन्हा दाखल केला होता. “पैशाच्या जोरावर हे अधिकारी प्रत्येक वेळी न्यायालय आणि कार्यालयातून आपली सुटका करून घेतात,” असा थेट आरोप या पत्रात आहे.दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक दस्तऐवज लेखनातून (रजिस्ट्रेशन) लाच घेतल्याशिवाय कोणतेही काम केले जात नाही. या माध्यमातून संबधित अधिकाऱ्याने कोट्यवधी रुपयांची अवैध संपत्ती गोळा केल्याचा दावा शिवसेनतर्फे करण्यात आला आहे.या भ्रष्ट अधिकाऱ्याला जळगाव जामोद येथून तात्काळ बडतर्फ (सस्पेंड) करण्यात यावे आणि त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. जर यावर तात्काळ कडक कारवाई झाली नाही, तर बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन वैयक्तिकरीत्या जबाबदार असेल, असेही पत्रात ठणकावून सांगण्यात आले आहे.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, या तक्रारीच्या प्रती थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त (महसूल विभाग, अमरावती) आणि जिल्हाधिकारी (बुलढाणा) यांच्याकडे तात्काळ कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.










