ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) ऍग्रोकेअर कृषीमंच संस्थेच्या वतीने “महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड २०२६” पुरस्काराची घोषणा महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण दि. ८ मे रोजी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात भारत सरकारकडून पद्मश्री व महाराष्ट्र राज्याचा वनभूषण पुरस्कार प्राप्त माननीय चैत्राम पवार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. संजीव सोनवणे, निवृत्त संचालक (फलोत्पादन) डॉ. कैलास मोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, प्रकल्प संचालक आत्मा अभिमन्यू काशीद तसेच संस्थापक अध्यक्ष भुषण निकम यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण व सांगोपणसाठी तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अन्नधान्य व शालेय साहित्य घेण्यासाठी 3 लाख रुपयाचा धनादेश वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाबाबतची माहिती आयोजक रोहिणी पाटील यांनी दिली.
या पुरस्कारासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन पुरस्कारार्थींचा समावेश आहे.
राजीव जावळे पाटील यांना कृषीपूरक उद्योग उभारणी आणि समाधान पुंडलीकराव दामधर (बुलढाणा) यांना सामाजिक योगदान यासाठी देण्यात आले आहेत.
राजीव जावळे पाटील यांनी आभाळमाया अग्रो प्रोड्यूसर कंपनी लि च्या माध्यमातून फ्रोझन फ़ूड चा अद्यावत उद्योग उभा केला असून त्यामध्ये दिवसाला २५० क्विंटल फळांवर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भ मराठवाड्यातील फळबाग पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून कोनड ता चिखली सारख्या छोट्या गावात २०० ते २५० लोकांना रोजगार मिळणार आहे. तसेच AAPCO Natural Food Chain च्या माध्यमातून आता विदर्भ मराठवाड्यातील मालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. याशिवाय त्यांनी साई माऊली सीड्स प्रा लि च्या माध्यमातून बियाणे क्षेत्रात आणि शिवशंभू अर्बन च्या माध्यमातून सहकार क्षेत्रात ही आपला ठसा उमटवला आहे. राजीव जावळे हे चिखली बाजार समितीचे उपसभापती सुद्धा राहिलेले आहेत.
समाधान दामधर यांनी बियाणे क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले असून जवळपास २१ देशांना यानिमित्ताने त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. आपली उच्चपदस्थ नोकरी सोडून त्यांनीग्रामीण भागात रोजगार निर्मिती करिता उद्योग उभारणी व समाजसेवेचा मार्ग निवडला असून जळगाव जामोद सारख्या दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे विराट बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सस्था असेल, जामोद येथे अभ्यासिका असतील यासारखे उपक्रम सुरू केले. त्यांनी आदिवासी भागात जाऊन तेथील दुर्लक्षित लोकांच्या शिक्षण व आरोग्या साठी भरीव काम केले आहे. तसेच पूजा मॉल, ग्रीन स्टोन सिड्स प्रा लि च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण केला आहे. नव्याने होऊ घातलेला त्यांचा नागवेली दूध उत्पादक व प्रक्रिया फेडरेशन या उद्योगाने जळगाव जामोद तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध व दुग्धपदार्थ निर्मिती होणार असून यामाध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना तर फायदा होणारच आहे त्याशिवाय रोजगार ही मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे.
हे दोन्ही पुरस्कार प्राप्त तरुण डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी पदवीधारक असून दोघांनी ही एमबीए चे व्यावसायिक क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. याच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासाने जिल्ह्यातील तरुण कृषी पदवी धारकांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.











