बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘शिवाजी कोण होता?’ या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकावरून पुन्हा एकदा राज्यात राजकीय वाद उसळला असून, संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने वातावरण तापलं आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होताच विरोधकांनी जोरदार टीका केली. दबाव वाढताच गायकवाडांनी अखेर माफी मागितली.
या सगळ्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे, मात्र ४० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकावरून आज वाद निर्माण करणं कितपत योग्य?” असा थेट सवाल त्यांनी केला.
फडणवीस यांनी शिवराळ भाषेवरही कडक शब्दांत नाराजी व्यक्त करत, अशा प्रकारचं वर्तन अजिबात योग्य नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः गायकवाडांना योग्य ती समज देतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, पुढे आणखी कोणते पडसाद उमटतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.










