बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यात ‘खरात’ प्रकरणाने निर्माण झालेल्या खळबळीच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधातील लढा अधिक तीव्र झाला असताना, आज बुलढाण्यात आलेल्या श्याम मानव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्याम मानव यांनी भोंदूबाबा, जादूटोणा आणि अंधश्रद्धेविरोधातील लढ्याचा आढावा घेत असताना एक धक्कादायक अनुभव सांगितला. २०१३ साली अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर, २०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने समिती स्थापन केली होती.
मानव यांनी सांगितले की, या कामासाठी निधी मिळावा यासाठी त्यांनी अनेकदा फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला सकारात्मक भूमिका घेतली गेली, मात्र नंतर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. “मी वारंवार मंत्रालयात चकरा मारत राहिलो, पण आम्हाला केवळ झुलवण्यात आलं,” असा थेट आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी काँग्रेसच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात कोणताही अडथळा आला नसल्याचे सांगत, सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. याशिवाय, एका भाजप नगरसेवकाने एका प्रकरणात हस्तक्षेप केल्याचाही गंभीर दावा त्यांनी केला.
अंधश्रद्धा रोखण्याऐवजी ती वाढू दिली गेली, त्यामुळेच ‘खरात’सारखी प्रकरणे घडत आहेत, असा आरोप करत मानव यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या स्फोटक आरोपांमुळे बुलढाण्यासह राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, आता सत्ताधाऱ्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










