मेहकर (हॅलो बुलडाणा) येथील भूमी अभिलेख कार्यालयातील बेजबाबदारपणाचा कळस गाठला असून नागरिकांना अक्षरशः वेठीस धरले जात आहे. कार्यालयाची वेळ सुरू, दरवाजे उघडे; मात्र कर्मचारी खुर्च्यांवर नाहीत असे संतापजनक चित्र रोजच पाहायला मिळत आहे. जमिनीची मोजणी, फेरफार, नोंद दुरुस्ती आदी महत्त्वाच्या कामांसाठी ग्रामीण भागातून शेतकरी सकाळपासून रांगेत उभे असतात; पण “साहेब आले नाहीत” किंवा “थोड्या वेळात येतील” अशी उत्तरे देत त्यांना ताटकळत ठेवले जाते.
अनेक कर्मचारी हजेरी लावून गायब होत असल्याची चर्चा असून त्यामुळे शेकडो फाईल्स प्रलंबित पडल्या आहेत. नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नेमके कुठे आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यभर मागण्यांसाठी आंदोलन सुरू असतानाही कार्यालयीन वेळेत गैरहजर राहण्याचे प्रकार संतापजनक आहेत.
मेहकरमधील हा ‘भोंगळ कारभार’ तात्काळ थांबवून संबंधित कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रशासन जागे होणार का? असा सवाल आता सर्वसामान्यांतून केला जात आहे.










