बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा, निर्णयक्षम नेतृत्व आणि ‘दादा’ म्हणून ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान घडलेल्या या भीषण दुर्घटनेत दादांचे प्राण गेले आणि महाराष्ट्राने एक कणखर, बेधडक नेता गमावला.
या हृदयद्रावक घटनेच्या निषेधार्थ व दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात आज सर्वपक्षीय कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. राजकीय मतभेद विसरून सर्व पक्ष एकत्र आले असून, हा निर्णय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष टी.डी. अंभोरे, राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ काकस, भाजप नेते दत्ताभाऊ पाटील, चंद्रकांत बर्दे, महादेव शेळके, अनिल बावस्कर, बबलू कुरेशी, सुजित देशमुख, सुनील सोनुने यांच्या समावेत बंदचा निर्णय घेण्यात आला.
आज सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यात बाजारपेठा, व्यापारी आस्थापना, खासगी व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले असून, सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे. दादांचा थेटपणा, जनतेसाठीचा संघर्ष आणि निर्भीड निर्णयशक्ती इतिहासात अजरामर राहील. बुलढाण्याने आज अश्रूंनी आपल्या ‘दादांना’ अखेरचा सलाम केला आहे.










