बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहर ठाणेदार राठोड यांच्या नेतृत्वाखाली गहाळ झालेल्या 22 मोबाईलचा शोध लावण्यात येताच पुन्हा रविवारच्या आठवडी बाजारात आठ ते दहा मोबाईल चोरी गेल्याची ओरड सुरू झाली आहे.स्थानिक तानाजी नगर येथील एक शिक्षक याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता आधीच तिथे सात ते आठ जण चोरीची तक्रार देण्यासाठी उभे होते.
शहरात रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. बाजारातील गर्दीचा फायदा घेत ८ ते १० जणांचे हजारो रुपयांचे मोबाईल हातोहात लंपास केले. रविवारी आठवडी बाजार भरला जातो. बाजारात झालेल्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात येणाऱ्या ग्राहकांचे मोबाईल लंपास होत आहेत. बाजारात वस्तू खरेदी करण्यात मग्न असलेले नागरिक पाहून त्यांचे मोबाईल खिशातून अलगद उचलले जातात. यामुळे हे मोबाईल चोरटे सराईत असून रविवारी सायंकाळी बाजारात चांगल्या कंपनीची आणि मोठ्या किंमतीचे मोबाईल चोरले आहेत.शहर पोलिसांनी गहाळ झालेले 22 मोबाईल मूळ मालकांना नुकतेच परत केले आणि पुन्हा बाजारामध्ये चोरटे सक्रिय झाले आहे.अशा मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.