जळगाव जामोद (ज्ञानदेव राजनकर/हॅलो बुलढाणा) महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला नवी धार देणारा महत्त्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने घेतला आहे. राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी जळगाव जामोद येथील अविनाश जगन्नाथ उमरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने १८ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकातून उमरकर यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेस अध्यक्षांनी राज्यनिहाय प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण जबाबदारी उमरकरांकडे सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे राज्यातील काँग्रेसच्या ग्रामीण संघटनात्मक यंत्रणेला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा आहे. पंचायतराज व्यवस्था अधिक सक्षम करणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि काँग्रेसची धोरणे गावागावांत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी आता उमरकरांच्या खांद्यावर असेल.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाची मानली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर संघटनेची मजबूत बांधणी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. नियुक्तीची घोषणा होताच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उमरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.















Total Users : 3308510