spot_img
spot_img

खामगाव–जालना रेल्वे मार्गाला वेग; बुलढाणेकरांसाठी ‘गोड बातमी’ लवकरच!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव-जालना रेल्वे मार्गाला अखेर गती मिळत असून, बुलढाणा जिल्ह्यासाठी ही मोठी विकासाची संधी ठरणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला.

या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गामुळे मध्य आणि सेंट्रल रेल्वेचे जाळे थेट जोडले जाणार असून, जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीपैकी 50 टक्के हिस्सा राज्य सरकारने उचलण्याची तयारी दाखवली असून, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. उर्वरित निधीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने आता अंतिम मंजुरीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, लवकरच यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांनी 2009 पासून या रेल्वेमार्गासाठी सातत्याने लढा दिला आहे. लोकसभेत वारंवार प्रश्न उपस्थित करत त्यांनी हा मुद्दा जिवंत ठेवला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आणि पुढे हा प्रकल्प पुंजी निवेश कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला.

आता या रेल्वे मार्गाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा संपत आली असून, खामगांव-जालना रेल्वे हा बुलढाणेकरांसाठी विकासाचा नवा अध्याय ठरणार, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. लवकरच जिल्हावासीयांना मोठी ‘गुड न्यूज’ मिळण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!