जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असताना, जळगाव जामोद तालुक्यात सर्व्हर डाऊन, लिंक बंद आणि पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः फरफट सुरू आहे.
तालुक्यातील कॉमन सर्व्हिस सेंटर, महा-ई-सेवा केंद्र आणि इतर सेवा केंद्रांवर सकाळपासून शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र तासन्तास प्रतीक्षा करूनही अर्ज प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यातच ३० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने संकट आणखी गंभीर झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यासाठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून प्रशासनाकडून ३१ जुलैपूर्वी विमा भरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र पोर्टलच चालत नसेल तर शेतकऱ्यांनी विमा भरायचा तरी कसा, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून पीक विम्याची मुदत वाढवावी, अन्यथा हजारो पात्र शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहतील, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.











Total Users : 3208082