देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांचा आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध करत गुरुवार, 23 जुलै रोजी देऊळगाव मही येथे विद्यार्थी, पालक, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी आक्रमक मोर्चा काढला.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या मोर्चात नागरिकांनी हातात तिरंगा घेत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “पेपर चोर गद्दी छोड”, “शिक्षण वाचवा, देश-घटना वाचवा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या”, “पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पेपरफुटीच्या कथित प्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या प्रकरणांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करावी आणि भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चात विद्यार्थी, युवक, पालक आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहळकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.










