सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील देवखेड येथील तब्बल ५० हून अधिक शाळकरी मुलींना शिक्षणासाठी दररोज सुमारे साडेतीन किलोमीटर पायी रुम्हणा गाठावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, “मुलींना तात्काळ शालेय बस उपलब्ध करून द्या, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडू”, असा इशारा लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड आणि ग्रामस्थांनी दिला आहे.
देवखेडमध्ये प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर कुटुंबे वास्तव्यास आहेत. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी वाहनांचा खर्च पालकांना परवडत नसल्याने मुलींना रोज पायी शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत गटशिक्षणाधिकारी, सिंदखेडराजा यांना लेखी निवेदन देत तातडीने बसची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने दखल न घेतल्यास लोकजागर परिवार, क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे










