बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासीबहुल भिंगारा आणि चाळीस टपरी गावातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी आज, २० जुलै रोजी थेट बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलनाचा पवित्रा घेत ठिय्या मांडला आहे. “आमच्या मुलांना शिक्षक द्या, अन्यथा येथून उठणार नाही,” असा आक्रमक इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शाळांमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हीच भविष्याची आशा असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात असल्याचा आरोप पालकांनी केला.
या प्रश्नावर यापूर्वीही अनेकदा निवेदने देण्यात आली; मात्र ठोस कार्यवाही झाली नसल्याने अखेर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले. भिंगारा आणि चाळीस टपरी येथील शाळांतील सर्व रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत आणि प्रत्यक्ष शिक्षक रुजू करावेत, अशी त्यांची ठाम मागणी आहे










